Nitin Gadkari news: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच जात आणि धर्म यासंदर्भात मोठे विधान केले आहे. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक संवादात ते कधीही जाती-धर्माचा उल्लेख करत नाहीत. कारण त्यांच्या मते, समाजसेवा हाच सर्वोच्च धर्म आहे. राजकारणात जात आणि धर्म यावर भर दिला जातो, मात्र त्यांनी आपल्या कारकीर्दीत हा दृष्टिकोन कायमस्वरूपी नाकारला आहे.

गडकरी म्हणाले की, “मी मंत्री राहिलो नाही किंवा निवडणूक हरलो तरी काही फरक पडत नाही. कारण मी माझ्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही.” राजकारणात अनेकदा काही गोष्टी बोलू नयेत, असा सल्ला मिळतो. मात्र, मी नेहमी माझ्या विचारांवर ठाम राहिलो आणि कोणतीही भीती न बाळगता माझ्या धोरणांप्रमाणे कार्य केले.”
गडकरी यांनी त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वाचा निर्णय सांगितला. आमदार असताना त्यांनी अंजुमन ए इस्लाम संस्थेला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिली. त्यावेळी त्यांना वाटले की मुस्लिम समाजातील तरुणांसाठी शिक्षणाची संधी निर्माण करणे गरजेचे आहे.
“मुस्लिम समाजातील अधिकाधिक तरुणांनी इंजिनिअर, आयपीएस आणि आयएएस अधिकारी बनल्यास संपूर्ण समाजाच्या प्रगतीला चालना मिळेल,” असे गडकरी यांनी स्पष्ट केले.त्यासाठी त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले.
हेही वाचा:-👇
आज हजारो विद्यार्थी अंजुमन ए इस्लामच्या संस्थेतून इंजिनिअर झाले आहेत. जर त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसती, तर त्यांचे भवितव्य अंधारात राहिले असते. “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे,” असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून संधी मिळाल्यास कोणताही समाज पुढे जाऊ शकतो आणि संपूर्ण देशाचा विकास होऊ शकतो, हे त्यांनी अधोरेखित केले.
नितीन गडकरी यांचे हे विधान राजकारणात प्रचलित असलेल्या जाती-धर्माच्या चर्चेपेक्षा वेगळे आहे. समाजसेवा आणि शिक्षणाच्या प्रसाराला अधिक महत्त्व देणारा हा दृष्टिकोन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो.
त्यांच्या या भूमिकेवर अनेकांकडून प्रशंसा होत आहे, तर काहींनी त्यावर टीका देखील केली आहे. मात्र, गडकरी यांनी यापूर्वीही आपल्या विचारधारेवर ठाम राहून निर्णय घेतले आहेत आणि भविष्यातही ते आपल्या तत्त्वांवर ठाम राहतील, असे दिसते.